पाथरी,(प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पाथरी तालुक्यातील वडी येथील अंगणवाडीत भक्ती, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. अंगणवाडीतील चिमुकल्या बालगोपालांनी पारंपरिक वेशभूषेत सजून गावातून भक्तिमय दिंडी काढत वारकरी परंपरेचा जागर केला. ‘मुखी विठ्ठल, हृदयी विठ्ठल, जय हरी विठ्ठल!’ च्या गजराने परिसर भक्तिमय झाला.

आषाढी एकादशीनिमित्त आयोजित या उपक्रमात बालकांनी विठ्ठल-रखुमाईसह विविध वारकरी वेशभूषेत सहभाग घेतला. टाळ-मृदुंगाच्या निनादात निघालेल्या दिंडीने गावकर्यांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमातून बालकांना महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेची ओळख करून देतानाच भक्ती, संस्कार आणि सामाजिक मूल्यांचे धडे देण्यात आले. दिंडीनंतर अंगणवाडी परिसरात वृक्षलागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. ‘एक मूल-एक झाड’ या संकल्पनेतून प्रत्येक बालकाने स्वतःच्या हस्ते एक रोप लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला. बालवयातच निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे अंगणवाडी परिसरात उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरण निर्माण झाले. भक्ती, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार्या या उपक्रमाचे गावकर्यांसह सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंगणवाडी सेविका विजयमाला गिलबिले, मिरा पांचाळ, मिना थावरे, अर्चना दुधगावकर, मंजुळा आव्हाड, राजामती आव्हाड आदींनी विशेष परिश्रम घेतले.


