*परभणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३४ हजार एकल महिला*
परभणी, (प्रतिनिधी) -महिला व बालकल्याण विकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी राज्यातील एकल महिलांच्या प्रश्नात लक्ष घातले असून त्यांनी त्यांच्या परभणी जिल्ह्यापासून एकल महिलांच्या सर्वेक्षणास अंगणवाडी सेविकांच्या मदतीने सुरुवात केली आहे.
सुरुवातीला परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात सर्वेक्षण पूर्ण झाले असून नगरपंचायत,नगरपालिका, महापालिका सर्वेक्षण सुरू आहे. त्याचीही आकडेवारी लवकरच जाहीर होईल.
ग्रामपंचायत क्षेत्रात अंगणवाडी सेविकांनी केलेल्या
सर्वेक्षणात समाविष्ट ३४,७३३ महिला आढळल्या असून त्यापैकी सुमारे ९३ टक्के महिला विधवा आहेत तर ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील महिलांचे प्रमाण ५२.२४ टक्क्यांहून अधिक आहे. यापैकी सुमारे ७३.८३ टक्के महिला निरक्षर असून ५५ टक्क्यांहून अधिक महिला शेतमजुरीवर अवलंबून आहेत. परिणामी या महिलांना आरोग्य, निवारा, उपजीविका व सामाजिक सुरक्षा विषयक मूलभूत सेवा व सवलतींची तीव्र आवश्यकता आहे.
निरक्षर व अल्पशिक्षित महिलांची संख्या मोठी असल्याने त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मर्यादा येऊन पारंपरिक व्यवसाय व आधुनिकीकरण असा दृष्टिकोन घेऊन त्यांचे आर्थिक पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे मंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.
या एकल महिलांमध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील महिलांचे प्रमाण ५२.२४ टक्क्यांहून अधिक आहे, परंतु अशा महिलांसाठी वृद्धापकाळातील योजना खूपच कमी आहेत. अशा ज्येष्ठ नागरिक महिलांचे आरोग्य,सुरक्षितता,उदरनिर्वाह यासाठी योजनांची गरज आहे.
जमिनीचा मालकी हक्क, राहते घर, उत्पन्नाचे साधन यांचा अभावही मोठ्या प्रमाणावर आढळून आला आहे. त्यामुळे वयोगट, शैक्षणिक स्तर, सामाजिक परिस्थिती व आर्थिक स्थिती यानुसार केंद्रित, लक्षवेधी आणि स्त्री-हितवादी हस्तक्षेप आवश्यक आहेत.
सदर अनुषंगाने शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, व सीएसआर (CSR) भागीदार यांच्यामार्फत सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून एकात्मिक धोरणात्मक कृती आराखडा राबवण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे.
यामध्ये एकल महिलांसाठी योजना, साक्षरता कार्यक्रम, सहाय्यता केंद्रे, महिला बचत गटांचे सशक्तीकरण, कौशल्यविकास प्रशिक्षण, गृहउद्योग प्रोत्साहन तसेच आरोग्य व निवारा सुविधा यांचा समावेश असणार आहे.
उमेद व मविम यांच्या मदतीने या महिलांचे स्वयंरोजगार उभे करण्याचे विशेष प्रयत्न करण्यात येतील..
हे सर्व कार्यक्रम राबवण्यासाठी तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर अधिकारी व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कृतीगट तयार करण्यात येणार असल्याचे मंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.
सर्वेक्षणाच्या माध्यमातून एकल महिलांच्या सक्षमीकरणास चालना मिळणार — मेघना बोर्डीकर
एकल महिला हा प्रश्न राज्यातील एक दुर्लक्षित प्रश्न आहे. त्यामुळे या महिलांच्या प्रश्नावर काम करतो आहोत. परभणी जिल्ह्यातील एकल महिलांवरील सर्वेक्षणाच्या अनुषंगाने हे स्पष्ट होते की, सदर महिलावर्ग सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व व्यवस्थात्मक दृष्टिकोनातून अत्यंत दुर्बल व असुरक्षित स्थितीत आहे. पण या कृती कार्यक्रमाने सर्वांगीण सक्षमीकरणास चालना मिळून, सामाजिक समावेश व महिला सन्मानाचे उद्दिष्ट या सर्वेक्षणाद्वारे साध्य करता येईल. हे सर्वेक्षण केल्याबद्दल अंगणवाडी सेविकांचे मी विशेष आभार मानते.
***


