वनामकृवित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन
परभणी (प्रतिनिधी)-शेती उत्पादन वाढले आहे, परंतु किडींचा प्रादुर्भाव. नैसर्गिक संकटे यामुळे शेती उत्पादनाची आणि अन्नधान्याच्या नासाडी मध्ये वाढ झालेली आहे. याबरोबरच जमिनीची प्रतही दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. यासारख्या समस्यासह सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल साध्य करणे तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या महत्त्वाच्या समस्या आहेत. तसेच डिजिटल प्रणालीद्वारे संवर्धित आणि संरक्षित शेती करण्यास चालना देणे आवश्यक असल्याचे मत माजी महासंचालक पद्मभुषण डॉ आर एस परोडा यांनी व्यक्त केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअर्स, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “नेक्स्ट-जेन डिजिटल कृषीसाठी अभियांत्रिकी नवकल्पना” या विषयावर इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअर्सची ५८ वे वार्षिक अधिवेशन आणि “कृषी परिवर्तनाकरिता इच्छुक युवकांसाठी कृषी अभियांत्रिकी शिक्षण” या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे दिनांक १२ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले. त्याचे उद्घाटन मंगळवारी (दि 12) रोजी पार पडले. त्याप्रसंगी डॉ आर एस परोडा बोलत होते.

अध्यक्षस्थानी कुलुगुरू मा. प्रा. (डॉ) इन्द्र मणि हे होते. उद्घाटन समारंभास मुख्य अतिथी म्हणून भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी महासंचालक पद्मभुषण डॉ आर एस परोडा तर विशेष अतिथी म्हणून भारतीय कृषि संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ हिमांशु पाठक (ऑनलाईन) आणि कृषि परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे (भाप्रसे ) हे होते. तसेच पीडीकेव्ही अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख महिंद्रा आणि महिंद्रा समूहाच्या शेती साहित्य विभागाचे अध्यक्ष डॉ. हेमंत सिक्का, टॅफेचे समूहाचे श्री टी आर केशवन, महिको समूहाचे श्री राजेंद्र बारवाले, आंतरराष्ट्रीय ट्रॅक्टर लि चे उपाध्यक्ष श्री कुमार बिमल, भारतीय कृषि अभियंता संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. गजेंद्र सिंह, डॉ. नवाब अली आणि डॉ. व्ही. एम. मायंदे यांच्यासह वनामकृविचे माजी कुलगुरू डॉ. के. पी. गोरे, वनामकृविचे माजी कुलगुरू डॉ. ए. एस. ढवण यांची विशेष उपस्थिती होती. व्यासपीठावर नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अभियंता संघटनेचे अध्यक्ष तथा उप महासंचालक कृषि अभियांत्रिकी डॉ. एस एन झा, संघटनेचे मुख्य सचिव डॉ. पी.के. साहू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय परिषदेचे संयोजक विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवर, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कुलसचिव संतोष वेणीकर, विद्यापीठ अभियंता दीपक कशाळकर, संयोजन सचिव डॉ हरीश आवारी, प्रगतशील शेतकरी श्री चंद्रकांतराव देशमुख, सुमित्रा शेंद्रे आदींची उपस्थिती होती.

उदघाटन प्रसंगी कृषि व कृषि अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानाबाबत भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी महासंचालक पद्मभुषण डॉ आर एस परोडा यांना आयएसएई मानद फेलाशीप २०२४ ने गौरविण्यात आले. यावेळी पद्मभुषण डॉ आर एस परोडा म्हणाले की, शेती उत्पादन वाढले आहे, परंतु किडींचा प्रादुर्भाव. नैसर्गिक संकटे यामुळे शेती उत्पादनाची आणि अन्नधान्याच्या नासाडी मध्ये वाढ झालेली आहे. याबरोबरच जमिनीची प्रतही दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. यासारख्या समस्यासह सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल साध्य करणे तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या महत्त्वाच्या समस्या आहेत. शेती उत्पादनावर प्रक्रिया उद्योग उभारणे आवश्यक आहे. भारत देश शेतीप्रधान आहे, यास शेतकरी प्रधान देश करणे गरजेचे आहे. समृद्ध शेती बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. शेती व्यवसायात युवकांचा सहभाग कमी असून तो वाढवणे आवश्यक आहे. युवकांनी पांढरपेशी नोकरी मिळवण्यापेक्षा शेती व्यवसायासह उद्योजक व्हावे. यासाठी युवकांमध्ये कौशल्यवृद्धी करावी लागेल यातूनच उत्कृष्ट शास्त्रज्ञ आणि कृषी अभियंते निर्माण होतील. शेती व्यवसायासाठी शाश्वत संसाधनांचीही आवश्यकता आहे. तसेच जमिनीच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून संवर्धित आणि संरक्षित शेती करण्यास चालना देणे आवश्यक आहे. या सर्व कार्यात कृषी अभियंत्याची महत्त्वाची भूमिका असून विशेषतः कोरडवाहू शेतीसाठी कृषी अभियांत्रिकीमधून तंत्रज्ञानाचा आणि यांत्रिकीकरणाचा विकास होण्याची आवश्यकता आहे. यासाठी कृषी क्षेत्रातील सर्व विभागांनी एकत्रतीतरित्या कार्य करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये भारतीय कृषि अभियंता संघटना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारत देश जगात सर्वात अधिक ट्रॅक्टर उत्पादन करीत असून जगातील अर्धा वाटा भारताचा आहे. याबरोबरच कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातून खुरपी-विळ्यापासून ते आधुनिक काढणी – मळणी यंत्रे याबरोबरच अन्नधान्य, सोयाबीन, फळ, भाजीपाला पिके यांच्या प्रक्रिया उद्योगासाठी अतिशय उपयुक्त आणि हाताळणीस सुलभ असणारे मशनरी आणि अवजारे विकसित केलेले आहेत असे नमूद करून त्यांनी ग्रामीण पातळीवर भाडेतत्त्वावर अवजारे देणारी बँक निर्माण करणे, खाजगी क्षेत्रातून विस्तार कार्यास चालना देणे, हरितगृहे विकसित करणे, सौरउर्जाचा वापर वाढवणे गरजेचे आहे. या सर्व क्षेत्रासाठी कृषी अभियांत्रिकी क्षेत्राचा सर्वस्तरावरून विकास होणे गरजेचे असून याद्वारे आधुनिक अवजारे आणि यांत्रिकीकरणास चालना मिळेल असे प्रतिपादन केले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांनी शैक्षणिक, औद्योगिक आणि शासन या त्रिस्तरीय यंत्रणेद्वारे समन्वयाने आणि एकसंघाने कार्य करून शेतीचा उत्कृष्ट विकास होईल. या क्षेत्राना एकत्रित करण्यासाठी विद्यापीठ कार्य करत आहे. कृषी क्षेत्रात झालेल्या संशोधनामुळे लोकसंख्या वाढत असली तरी संपूर्ण जगाला अन्नपुरवठा करण्याची क्षमता भारताने विकसित केलेली आहे. शेतकऱ्यांच्या विकासाकरिता विद्यापीठाने मोठ्या प्रमाणात बीज उत्पादनाचे कार्य हाती घेतले आहे. विद्यापीठ परिसरात सिंचनाच्या सुविधा मध्ये वाढ केलेली आहे. ट्रॅक्टरचे सर्व मॉडेल विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ठेवले असून यातून ट्रॅक्टरचे उत्कृष्ट अभियंते निर्माण होण्यास मदत मिळणार आहे असे नमूद करून ते पुढे म्हणाले की, विद्यापीठाने चार नवीन महाविद्यालये सुरू केलेले असून शैक्षणिक कार्यात विद्यापीठ आघाडीवर आहे तसेच शेतकऱ्यांसाठी सेवाभाव वृत्तीने कार्य करत असून शेतकऱ्यांचे समस्या समजावून घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी प्राध्यापक ते कुलगुरू असे सर्व शास्त्रज्ञ दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी “माझा एक दिवस माझा बळीराजा सोबत” हा कार्यक्रम शेतकऱ्यांचा शेतावर जावून तसेच दर मंगळवारी आणि शुक्रवारी ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषी संवाद राबविला जातो. यावेळी त्यांनी कृषी अभियांत्रिकी क्षेत्राचा विकास करण्यासाठी भविष्यात उच्च नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचेही नमूद केले.
भारतीय कृषि संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ हिमांशु पाठक यांनी कार्यक्रमासाठी संदेश पाठविला याचे वाचन शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी केले. कृषि परिषदेचे महासंचालक श्री रावसाहेब भागडे (भाप्रसे ) यांनी अतिशय उत्कृष्ट परिसंवादाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
भारतीय कृषि अभियंता संघटनेचे अध्यक्ष तथा उप महासंचालक कृषि अभियांत्रिकी डॉ. एस एन झा यांनी कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील कृषी अभियांत्रिकी संघटनेने मिळवलेल्या यश, शेती तंत्रज्ञान, मशिनरी, यांत्रिकीकरण, विविध साहित्य विकासात केलेल्या प्रगतीचा आढावा सादर केला. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी तंत्रज्ञानाचा लवकर अवलंब करतात परंतु शेतीमध्ये कार्य करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. यासाठी त्यांना आधुनिक तंत्रज्ञान देऊन शेतीची आवड निर्माण करावी लागेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले
महिंद्रा आणि महिंद्रा समूहाच्या शेती साहित्य विभागाचे अध्यक्ष डॉ. हेमंत सिक्का यांनी संघटनेच्या मदतीने हवामान बदलावर तंत्रज्ञान विकास, मृद संधारण तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण विकास यामध्ये महत्त्वाचे कार्य झाल्याचे नमूद केले. तसेच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी शंभरहून अधिक देशात कार्य करत असून जगातील एक नामांकित कंपनी म्हणून शेती विकासासाठी आधुनिक यंत्रसामुग्री निर्माण करून कार्य करत आहे असे सांगितले.
टॅफेचे समूहाचे श्री टी आर केशवन म्हणाले की, सर्व शेतकऱ्यांना सारखेच निविष्ठा मिळणे आवश्यक असून त्याचा वापरही सारखाच होणे आवश्यक आहे. तसेच शेतकरी ते शेतकरी तंत्रज्ञान पोहोचत असल्यामुळे शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रांनी समन्वयाने कार्य करून शेतकऱ्यांना सुलभ हाताळणीचे तंत्र द्यावे असे प्रतिपादन केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी केले तर संघटनेचे मुख्य सचिव डॉ. पी.के. साहू यांनी यांनी ५८ वे वार्षिक अधिवेशन बाबत माहिती दिली.
कार्यक्रमात परिसंवादाची स्मरणिका, विद्यापीठाचे न्यूज लेटर, डिरेक्टरी ऑफ एग्रीकल्चर इंजिनियर्स इन इंडिया, संघटनेची २०२५ ची दिनदर्शिका आणि संघटनेच्या जर्नलच्या दोन मासिकांचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच तीन दिवशीय परिसंवादामध्ये अतिशय सुशोभनीय आणि तंत्रज्ञानाने भरगच्च अशा कृषी तंत्रज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कृषि अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानाबाबत भारतीय कृषि अभियंता संघटनेद्वारा डॉ. सत्यानंद स्वेन आणि डॉ प्रीतम चंद्रा यांना स्वर्ण पदकाने तसेच संघटनेतील विविध शास्त्रज्ञांचे त्यांच्या कार्याबद्दल विविध पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरू मा. डॉ.इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय परिषदेचे संयोजक विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ उदय खोडके, संयोजन सचिव डॉ हरीश आवारी, सह संयोजक डॉ. आर. टी रामटेके आणि डॉ. आर जी. भाग्यवंत, संयोजन सह सचिव डॉ. एम. एस. पेंडके, डॉ. व्ही. के. इंगळे आणि डॉ. डी.डी. टेकाळे यांनी केले आहे. कार्यक्रमात विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी, अधिकारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव आणि डॉ. दयानंद मोरे यांनी केले तर आभार डॉ. हरीश आवारी यांनी मानले.


