परभणी,(प्रतिनिधी) शहरातील समांतर पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटार योजनेसह अन्य प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. परभणीच्या प्रश्नासाठी नेहमीच विधानसभेत आवाज उठवला आहे तसेच सरकारकडे वेळोवेळी मागणी केली आहे त्यामुळे परभणीकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावा अशी मागणी आ.राहुल पाटील यांनी केली. लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
परभणीतील कृषी विद्यापीठातील बैठकीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परभणी दौऱ्यावर आले असता आ.पाटील यांनी फडणवीस यांची लोकप्रतिनिधी या नात्याने स्वागत केले आणि त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन मतदार संघातील विविध विषयावर चर्चा केली
सरकारने वेळोवेळी समांतर पाणीपुरवठा योजना व भूमिगत गटार योजनेची घोषणा केली परंतु अद्याप या योजनांची पूर्तता झाली नाही, शहरात भूमिगत गटार योजना नसल्यामुळे सांडपाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे यामुळे रस्ते खराब होत आहेत असे सांगत सांडपाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी भूमिगत गटार योजनेला निधी द्यावा, सोबतच शहरातील पाणीटंचाई कायमची दूर करण्यासाठी समांतर पाणी पुरवठा योजनेला देखील भरीव निधी देऊन ही योजना पूर्ण करावी अशी मागणी करण्यात आली.
परभणी महानगरपालिकेचे नटराज रंगमंदिर हे जीर्ण झाल्याने बंद अवस्थेत आहे.परभणी साठी नवे नाट्यगृह उभारण्याचे काम काही वर्षापूर्वी सुरू करण्यात आले होते परंतु निधी अभावी नव्या नाट्यगृहाचे काम अर्धवट स्वरूपात बंद पडले आहे, या नाट्यगृहाला वाढीव निधी देऊन नाट्यगृहाचे काम पूर्ण करावे अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली.
शहरात जुन्या भागात पक्के रस्ते नाहीत त्यासोबतच नवीन वसाहतीमध्ये रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत आहेत, अजूनही नाल्यांचा प्रश्न सुटलेला नाही, शहरात पक्के आणि मजबूत रस्ते तयार करण्यासाठी भरिव निधी द्यावा तसेच नवीन वसाहतीमध्ये रस्ते तयार करण्यासाठी मोठा निधी लागणार आहे त्यामुळे रस्त्यांच्या कामांना मंजुरी द्यावी, नवीन वसाहती मध्ये रस्ते तयार करण्यासाठी विशेष निधी द्यावा,
शहरात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची स्मारक व्हावे अशी समाज बांधवांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. स्मारकाची जागा निश्चित झाली आहे परंतु त्या जागेवर अतिक्रमण झाली आहे हे अतिक्रमण काढून टाकण्यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सभागृहात घोषणा केली परंतु त्याची अंमलबजावणी अजून झाली नाही त्यामुळे संबंधित अतिक्रमण काढून टाकण्याचे निर्देश द्यावेत व स्मारकाच्या कामासाठी निधी देऊन स्मारक लवकर पूर्ण करावे अशी मागणी केली. शहरातील निम्म्याहून अधिक भागातील सांडपाणी एकत्रितपणे वाहून नेणारा डिग्गी नाला या नावाने प्रसिद्ध आहे.परंतु काही वर्षांपासून या नाल्यात गाळ साचला आहे या डिग्गीनाल्याला विशेष बाब म्हणून निधी देऊन खोलीकरण आणि रुंदीकरण केल्यास शहरातील सर्व सांडपाणी एकाच दिशेने शहरा बाहेर जाईल, त्यासाठी भरीव निधी द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
*क्रीडा संकुलाला जागा द्या*
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात तालुका क्रीडा संकुलाचा प्रस्ताव मंजूर आहे. परंतु मंत्रालय स्तरावर जागेचा प्रश्न प्रलंबित आहे, यावर निर्णय घेऊन तात्काळ जागा देण्यासंदर्भात विद्यापीठाला निर्देश द्यावेत अशी मागणी आ. पाटील यांनी केली तसेच कृषी विद्यापीठात सायन्स पार्क उभारण्यात येत आहे परंतु निधी कमी पडल्याने या सायन्स पार्कचे काम थांबले आहे त्यामुळे सायन्स पार्कच्या उर्वरित बांधकामासाठी निधी द्यावा अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी यावेळी केली.