परभणी,(प्रतिनिधी) परभणी मतदार संघात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य व किराणा साहित्याच्या किट वाटपास आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून नांदखेडा येथे सुरुवात करण्यात आली.
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे, घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. या नुकसानग्रस्त शेतकरी व इतर कुटुंबाला थोडीशी मदत व्हावी म्हणून आमदार डॉ. पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून किमान एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य किराणा साहित्य नुकसानग्रस्त कुटुंबाला देण्याची संकल्पना मांडली आणि या संकल्पनेतून त्यांनी त्यांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन केले. या आव्हानाला प्रतिसाद देत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी देखील हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी नांदखेडा येथे भेट दिली. या भेटीत त्यांनी नुकसानीचे पाहणी करुन ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी त्यांच्या हस्ते नुकसानग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य व किराणा साहित्याची किट देण्यात आली. हा उपक्रम संपूर्ण मतदारसंघात राबवावा असे आवाहन यावेळी आमदार पाटील यांनी बोलताना केले.त्यामुळे मतदारसंघात ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी मुळे नुकसान झाले अश्या सर्व शेतकऱ्यांना व कुटुंबांना सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते किट चे वाटप करणार आहेत.
या किटमध्ये गहू, तांदूळ,डाळ, गोडतेल, साखर यासह इतर वस्तूंचा समावेश असणार आहे.यावेळी संदीपराव झाडे, उत्तमराव मुळे, बंडू नाना बिडकर, शिवाजीराव चोपडे, सुभाष चव्हाण, मोईन पटेल,गंगाधर गाडगे,विष्णू बोरचाटे,रामभाऊ कदम, दामोधर सानप, रमेशराव चोपडे, देवांस चिटकरे, गलांडे,सुदर्शन भराड,संजय साखरवाड,रामजी नालमे,पांडुरंग डोंबे,प्रकाश भराड आदी उपस्थित होते.


