परभणी,(प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अस्तित्वात असणार्या जुन्या भूस्रोतांच्या बळकटीकरणासाठी संबंधित यंत्रणा, जिल्हा नियोजन आणि सीएसआर फंडाच्या माध्यमातून आपण गतिशील प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.
येणार्या पावसाळ्यात पाण्याची स्थिती उत्तम रहावी यासाठी याच उन्हाळ्यात जलस्त्रोतांच्या बळकटीकरणासाठी त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष इंजि. शंकर आजेगावकर यांनी पालकमंत्री बोर्डीकर यांची भेट घेवून चर्चा केली. तसेच आपल्या मागणी संदर्भातील एक निवेदन सादर केले. त्याद्वारे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘नॅशनल कंपायलेशन ऑन डायनामिक ग्राउंड वॉटर रिसोर्सेस ऑफ इंडिया’ यांच्या अहवालानुसार भूजलाच्या अमर्याद्वापरामुळे जमिनीखालील पाण्याची स्थिती अत्यंत गंभीर होत आहे. परभणी जिल्हा हा गोदावरी खोर्यातील सुपीक जिल्हा असताना जमिनीवरील पाण्याच्या (सरफेस वॉटरच्या) कमतरतेमुळे घरगुती तसेच शेती, औद्योगिक वापरासाठी भूजलाचा वापर मागील काही वर्षात अमर्यादपणे वाढला आहे.त्यातच जुन्या पुरातन जलस्त्रोतांच्या देखभाल दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांचीही अवस्था खराब झाली आहे. त्यामुळे येणार्या पावसाळ्यात पाण्याची स्थिती उत्तम रहावी यासाठी याच उन्हाळ्यात जलस्त्रोतांच्या बळकटीकरणासाठी त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. तसेच योग्य निधी उपलब्ध झाल्यास लोकसभागातून जुन्या बारावा, विहिरी, तलाव यामधून गाळ उपसा मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी जन चळवळ उभारता येऊ शकेल, असेही निवेदनाद्वारे म्हटले.
दरम्यान, पालकमंत्री बोर्डीकर यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत जिल्ह्यातील अस्तित्वात असणार्या जुन्या भूस्रोतांच्या बळकटीकरणासाठी आपण गतीशील प्रयत्न करु, असे आश्वासन दिले.