परभणी (प्रतिनिधी) : प्रशासन – पत्रकारांच्या समन्वयातुन समाजहित साधावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्न जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आज शनिवार 1 नोव्हेंबर रोजी आयोजीत दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार सुभाष कच्छवे तर प्रमुख पाहुणे म्हणुन वनामकृवीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणि, अप्पर आयुक्त संभाजीनगर डॉ. प्रताप काळे, राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, इंडिया गॉट टॅलेंट च्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेले, व्हॉइस ऑफ किशोरकुमार गायक राजु काजे,महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गोरे, प्रा. सुनिल तुरूकमाने, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दीपके, राज्य कार्यकारिणी सदस्य राजू हट्टेकर, कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर, कोषाध्यक्ष मोईन खान, यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले की, पत्रकारांनी खर्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणत समाजविकासात आपले योगदान दिले पाहिजे. प्रशासन – पत्रकारांच्या समन्वयातुन चांगल्या प्रकारे समाजहित साधल्या जाऊ शकते. समाजातील गरजवंतांचे प्रश्न सुटू शकतात असेही ते म्हणाले. पत्रकारांसोबत असलेला सुसंवाद हा प्रशासनाच्या दृृष्टीनेही फायद्याचा असतो असेही जिल्हाधिकारी म्हणााले. वनामकृवीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांनी जगात जर्मनी भारतात परभणी अशी सकारात्मक ओळख दूरवर पोहचत असल्याचे म्हटले. पत्रकारांच्या सहकार्यामुळे वनामकृवीने केलेले संशोधन शेतकर्यांपर्यंत पोहचण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजी नगरचे अप्पर आयुक्त डॉ. प्रताप काळे यांनी परभणी येथील आपल्या कार्यकाळात पत्रकारांसोबत सुसंवाद राहिला. परभणीकरांकडूनही प्रेम मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परभणी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दिपके यांनी केले. सूत्रसंचालन राहुल वहिवाळ तर आभार शेख इप्तेखार यांनी मानले. कार्यक्रमास पत्रकारांची मोठी उपस्थिती होती.


