परभणी, (प्रतिनिधी) लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जास्तीतजास्त मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजवावा, यासाठी स्वीपच्या माध्यमातून परभणी शहरात आज सकाळी काढण्यात आलेल्या मतदार जनजागृती सायकल रॅलीस विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जिल्हाधिकारी कार्यालय येथून सकाळी सायकल रॅलीस प्रारंभ झाला. यावेळी निवडणूक निरीक्षक श्रीमती के. हरिता, निवडणूक निरीक्षक संचिता बिष्णोई, निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजेश दुग्गल, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. रॅलीच्या समारोप ठिकाणी सदर मान्यवरांसह निवडणूक निरीक्षक (खर्च) राहूल मिश्रा उपस्थित होते.
मतदान हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा अमूल्य हक्क अवश्य बजवावा, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी व निवडणूक निरीक्षकांनी केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, स्वीपचे नोडल अधिकारी गणेश शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
सायकल रॅलीची सुरुवात सकाळी 8.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून ते पुढे बसस्टँड-उड्डान पुल-ज्ञानोपासक महाविद्यालय-रायगड कॉर्नर-सिव्हील हॉस्पिटल-शिवाजी चौक-नारायण चाळ-स्टेडियम-छत्रपती शिवाजी पुतळा-वसमत रोड-राजगोपालचारी उद्यान या मार्गाने सावली विश्राम गृह येथे रॅलीचा समारोप झाला. समारोप ठिकाणी रॅलीत सहभागी सर्वांना सदर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण वायकोस यांनी केले.
(छाया- उत्तम बोरसुरीकर)



