संविधानातील विचार व मूल्यांच्या संरक्षणासाठी भारत जोडो अभियानचे प्रशासनास निवेदन
परभणी(प्रतिनिधी) पुणे येथील फुले वाड्यामध्ये 28 नोव्हेंबरपासून ज्येष्ठ सामाजिक नेते डॉ. बाबा आढाव यांनी तीन दिवसीय आत्मक्लेश उपोषणास सुरुवात केली असून या उपोषणाला पाठींबा म्हणून परभणीमध्ये शुक्रवारी (दि.२९) एक दिवसीय उपोषण करत भारत जोडो अभियानकडुन जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सत्ता, संपत्ती जात व धर्मद्वेषाआधारे दररोज लोकशाहीचे वस्त्रहरण होत असून या विरोधामध्ये डॉ.बाबा आढाव व त्यांच्या समर्थकांनी पुणे फुलेवाडा येथे महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक 28 नोव्हेंबरपासून तीन दिवसीय आत्मक्लेश उपोषण सुरू केले आहे.
शाश्वत कायदा न करत जनतेला भुलविणाऱ्या योजना आणत, सत्तेचा दुरुपयोग करत, संविधानात कष्टकरी, वंचित वर्गाचे अधिकार पायदळी दररोज तुडवले जात आहेत. संविधानाच्या प्रस्तावनेचा बळी दिल्या जात आहे. संविधानाला कमजोर करण्यात येत आहे. मोजक्या उद्योगपतींच्या हाती देश विकल्या दिल्या जात आहे यासह अनेक मुद्द्यांना विरोध म्हणून परभणी येथे शुक्रवारी एक दिवस उपोषण करत डॉ.आढाव यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यात आला.
या उपोषणाचे आयोजन भारत जोडो अभियानचे समन्वयक डॉ.सुनील जाधव यांनी केले होते. यामध्ये साथी रामराव जाधव, एन.आय.काळे, दिगंबर जाधव, काँग्रेस मीडिया सेलचे सुहास पंडित, स्वराज इंडियाचे गोविंद गिरी, उस्मान शेख , सत्यनारायण खटिंग, एस.डी.ठोंबरे,लक्ष्मण गायकवाड , अरुण हरकळ, मितेश सुक्रे , अनिल अहिरे, संजय बागते आदी उपस्थित होते.



