परभणी (प्रतिनिधी) कै. सौ. कमलताई जामकर दर्पण पुरस्कार समिती आणि कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा कै. सौ. कमलताई जामकर दर्पण पुरस्कार ठाणे येथील निराधार, निराश्रित, मनोरुग्णांची आई स्मित फाउंडेशनच्या अध्यक्ष सामाजिक कार्यकर्त्या योजना घरत यांना मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी (ता.२८) प्रदान करण्यात आला.
अध्यक्षस्थानी नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर होते. यावेळी सत्कारमूर्ती कृषीभूषण कांतराव काका झरीकर, उपाध्यक्ष अॅड.किरणराव सुभेदार, संचालक मंगेशराव सुभेदार,पुरस्कार समितीचे उपाध्यक्ष . बाळासाहेब जामकर, पुरस्कार समितीचे सचिव विजय जामकर, समितीचे सहसचिव एकनाथ मोरे,अॅड.अशोक सोनी, सौ.दीपलक्ष्मीताई जामकर, सौ.संध्याताई जामकर,सौ.सोनियाताई जामकर, सौ.वसुंधराताई जामकर, मेघाताई देशमुख, सौ.नेहाताई जामकर, सौ.कविताताई सुभेदार, सौ.प्रतिमाताई देशमुख, रागिणी ओव्हळ, प्रा. किशन चोपडे, उपप्राचार्या डॉ.संगीता अवचार आदी उपस्थित होते. यावेळी योजना घरत यांना सन्मानचिन्ह, अकरा हजार रुपये रोख, मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने जीवन साधना गौरव पुरस्कारप्राप्त कृषीभूषण कांतराव काका देशमुख यांचाही सत्कार केला. योजना घरत पुरस्काराला उत्तर देताना म्हणाल्या, सामाजिक कार्य करायला अनेक अडचणी आल्या. पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे. लहानपणी शाळेत वर्गमैत्रिणी आईबाबांच्या गोष्टी शाळेत सांगायच्या त्यावेळी मी स्तब्ध व्हायचे तेंव्हाच ठरवलं की आपल्याला निराधारांसाठी काम करायचे आहे. तो प्रवास सुरु झाला. सुरुवातीला पाळणाघर सुरू केला. भोईसर मध्ये जवळजवळ दीडशे आईबाबांचा सांभाळ सुरुवात केली. समाजातील अनेक घटकांनी या वाटचालीत मदत केली. कधीच पैशाची गरज वाटली नाही. आज लोकसंख्याच्या तीस टक्के आईबाबा रस्त्यावर पडलेले आहेत याची अनेक कारणे आहेत. भिवंडी, ठाणे, पनवेल या ठिकाणी निराधार, निराश्रित आणि मनोरुग्णांसाठी काम करीत आहे. हे काम कठीण आहे. पण कोणीतरी केलं पाहिजे या उद्देशाने मी करीत आहे. घरात बंद असलेले, मुलांची भांडणे चालू असताना घरातून बाहेर पडलेले आईबाबा आम्हाला भेटतात. मुलगा हवा, भाऊ हवा मग बाप का नको. महिलांच्या मागे उभे असलेल्या प्रत्येक कर्तबगार पुरुषाला माझा सलाम. मुलं आईबाबांना का सोडतात हा प्रश्न मला नेहमी पडतो. अस वाटत की आपण मुलांच्या संस्कारात कमी पडतो काय की? ही भावना त्यांनी व्यक्त केली.यावेळी कांतराव देशमुख मनोगतात म्हणाले, कै. सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार अनेक कर्तबगार महिलांना दिला त्यामुळे ह्या पुरस्काराची उंची वाढली आहे. परभणीत अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाकडे आपण डोळसपणे बघत सर्वांनी ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपण सर्वांनी प्रयत्न केले तर नक्कीच प्रश्न मार्गी लागतील. यावेळी मनोगतात एकनाथ मोरे म्हणाले,रडत न बसता लढत राहणारी योजना घरत ह्या आपल्या कार्यकर्तृत्वाचा बळावर समाजाला हे दाखवून दिले आहे की निराधार आणि अनाथांना कोणीतरी आधार देणारा आहे. जामकर कुटुंब नेहमीच सामाजीक कार्यात अग्रेसर असतात. स्वतःसह इतरांना ही उभं करण्याचं काम करतात. ज्यांच्या समोर अनाथ लोक येतात त्यांनाच खरा भारत कळाला. मानवता हेच खरं गोत्र ओळखून घरतताईंनी आपलं कार्य चालू ठेवलं आहे. हा पुरस्कार शहाणपणाचा आदर म्हणून देण्यात येतो याचा आनंद आहे.
यावेळी स्मित फाउंडेशनच्या योजना घरत यांना कांतराव देशमुख यांनी अकरा हजार रुपयाची सानुग्रह राशी मदत म्हणून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संगीता अवचार यांनी केले. मानपत्राचे वाचन प्रा.रामप्रसाद देशमुख यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ.जयंत बोबडे यांनी करून दिला तर सूत्रसंचलन आणि आभार प्रा. अरुण पडघन यांनी केले.
यावेळी अॅड.न.ची.जाधव, भागवत घोडके, अजित गंगाळे, बाबुराव घाटगे, डॉ.रोहिदास नितोंडे, डॉ.तुकाराम फिसफिसे, प्राचार्य आर. के.चव्हाण, मु.अ. जी.एन.शिंदे, प्रा.मनीष देशमुख, मु.अ. जयश्री हत्तीअंबीरे आदींची उपस्थिती होती. यावेळी बहुसंख्येने प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते