परभणी,(प्रतिनिधी) : न्यायमुर्ती अनंत बदर समितीने अहवाल द्यावया संदर्भात सुरु केलेल्या वेळकाढूपणाच्या धोरणाच्या निषेधार्थ सकल मातंग समाजाने सोमवारी (दि.06) येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात हजारो समाजबांधव विशेषतः महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या. न्यायमुर्ती बदर हे आमच्या सोबत ‘वाय’ करत आहेत, वेळकाढूपणा करीत आहेत, त्या विरोधात हा मोर्चा आहे, असे सकल मातंग समाजबांधवांनी जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजीच निर्णय देऊन सरकारला आरक्षण वर्गीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी न्यायमुर्ती बदर समिती ही सरकारने नियुक्त केली. परंतु, एक वर्ष संपत आलेले असतांनासुध्दा न्यायमुर्ती बदर समितीने अद्याप अहवाल सादर केला नाही. सरकारनेसुध्दा या समितीस तात्काळ अहवाल द्यावा म्हणून आग्रह धरला नाही. खरेतर इतर राज्यात वर्गीकरणाची अंमलबजावनी सुरु आहे. परंतु ती महाराष्ट्रात का होत नाही, मेगा भरतीपूर्वी वर्गीकरणा करणार आहात की नाही, वर्गीकरण होईपर्यंत मेगा भरती बंद ठेवणार आहात का, असे अनेक प्रश्न उपस्थित करीत या मोर्चातील आंदोलनकर्त्यांनी न्यायमुर्ती बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ दिल्याबद्दल खंत व्यक्त केली.


