पालम, (प्रतिनिधी) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी यांच्या पुढाकारातून माधवराव पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पालम तसेच अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर (दिंडोरी प्रणित), नाशिक शाखा पालम यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” उत्साहात पार पडला.
या मेळाव्यास जिल्हाभरातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत रोजगाराच्या संधींचा लाभ घेतला.
या मेळाव्यात दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर आदी विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. विविध नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांची थेट मुलाखत घेऊन प्राथमिक व अंतिम निवड प्रक्रिया राबविली.
या रोजगार मेळाव्यास एकूण १८७ उमेदवारांनी उपस्थिती दर्शविली. त्यापैकी ६० उमेदवारांची प्राथमिक निवड, तर १२ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. त्यामुळे अनेक युवकांना रोजगाराच्या दिशेने नवी संधी उपलब्ध झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळीराजा शिक्षण संस्था सोमेश्वरचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार गोळेगावकर होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम अरसुळे, डॉ. एच. टी. सातपुते, स्वामी समर्थ केंद्र, पालमचे श्री. गडम तसेच कृष्णाताई इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी समाधान किरवले यांनी केले. त्यांनी शासनाच्या विविध रोजगाराभिमुख उपक्रमांची माहिती देत युवकांनी अशा मेळाव्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी येथील श्रीमती चेटले, राहुल गजभारे, सचिन चव्हाण आणि राहुल काळे यांनी मोलाचे सहकार्य केले, असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी म. शं.
शिंदे यांनी कळविले आहे.
या मेळाव्यामुळे जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना बळ मिळाले असून, युवकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा अशा उपक्रमांच्या यशाची साक्ष देणारा ठरला.
***


