परभणी (प्रतिनिधी) आबांच्या असीम कार्याचे स्मरण करत, त्यांनी दिलेला आदर्श, संस्कार आणि समाजकारणाचा वारसा नेटाने पुढे नेण्याचा आणि जीवनभर त्यासाठी झटण्याचा संकल्प आम्ही दृढ केला आहे,” असे प्रतिपादन ह.भ.प. नामदेव महाराज लबडे यांनी केले.
शिक्षण, अध्यात्म, व्यवहार आणि न्याय या सर्वच क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून समाजासाठी प्रेरणास्त्रोत ठरलेले वैकुंठवासी शिक्षणमहर्षी स्व. शेषरावजी धोंडजी भरोसे यांनी आयुष्यभर साधुसंतांची संगत जोपासली. प्रचंड वैभव आणि ऐश्वर्य असूनही त्यांनी परमार्थाचा मार्ग स्वीकारला आणि परमपूज्य रंगनाथ महाराज गुरुजी यांचे सच्चे सेवक व भक्त म्हणून जीवन व्यतीत केले.
स्व. भरोसे (आबा) यांनी आपल्या जीवनात परमार्थ जोपासला, समाजासाठी परमार्थ केला आणि इतरांना परमार्थाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या या विचारांचा आणि साधुसंतांच्या वसाचाच वारसा आज भरोसे कुटुंबीय पुढे नेत आहेत, असे गौरवोद्गार ह.भ.प. नामदेव महाराज लबडे यांनी आपल्या कीर्तनातून काढले.
शहरातील वसमत रोडवरील संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रांगणात (दि. ३ नोव्हेंबर, सोमवार) शिक्षणमहर्षी स्व. शेषरावजी धोंडजी भरोसे यांच्या सोळाव्या स्मृतिदिनानिमित्त ह.भ.प. नामदेव महाराज लबडे यांच्या कीर्तनाचे आयोजन भरोसे परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.
“त्यागाशिवाय शांती नाही, शांतीशिवाय सुख नाही”
या प्रसंगी नामदेव महाराज म्हणाले, “वारकरी संप्रदायाला वेदांत, अद्वैत आणि अध्यात्माची दृष्टी देणारे परमआदरणीय रंगनाथ महाराज गुरुजी होते. ही त्यांची प्रभावती भूमी आहे, आणि या भूमीतच गुरुजींचे सेवक व भक्त म्हणून लाभलेले वैकुंठवासी स्व. शेषरावजी भरोसे हे खऱ्या अर्थाने संतपरंपरेचे संवाहक होते.”
त्यांनी पुढे सांगितले, “कुठल्याही क्षेत्रात त्यागाला महत्त्व आहे; त्यागाशिवाय शांती नाही, आणि शांती शिवाय सुख नाही. संतज्ञानाद्वारे शांती मिळते. त्याग हे साधनात्मक आहे, तर शांती ही आध्यात्मिक आहे. समाज आज बहिरंग होत चालला आहे, त्यामुळे साधुसंत समाजात जन्म घेऊ शकत नाहीत. म्हणूनच संतांच्या विचारांचा दिवा हातात घेऊन प्रकाशाचा शोध घ्या. परमार्थात कधीही तडजोड करू नका. हर्ष आणि शोक यांचा त्याग केल्यावरच निंदा-स्तुतीचा परिणाम होत नाही.”
“आई-वडिलांची सेवा हीच खरी साधना”
“संत ज्ञानेश्वरांच्या अवताररूपात असलेले रंगनाथ महाराज गुरुजी हे आत्मज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारे होते. स्वतःला जपा, निर्व्यसनी रहा आणि संतसंगती ठेवा. संस्कार आणि चांगले विचार देणाऱ्या आई-वडिलांची सेवा स्वतःचा श्वास असेपर्यंत करा,” असे भावनिक आवाहन नामदेव महाराजांनी कीर्तनातून केले.
या कीर्तनास विविध क्षेत्रांतील महिला, पुरुष, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तीमय वातावरणात कीर्तन संपन्न झाले. शेवटी सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
Sunday, February 8
ताज्या बातम्या:
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांना सर्व पत्रकारातर्फे श्रद्धांजली अर्पण
- संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम; आत्मोन्नती प्रतिष्ठानचा उपक्रम
- शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
- मारोतराव लोमटे यांचे निधन
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांची उद्या परभणीत शोकसभा
- यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम आवश्यक- सर्वेश काबरा
- जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी;, पायाभूत सुविधा व ऊर्जेला नवी दिशा — राज्यमंत्री मेघना बोर्डीकर


