परभणी (प्रतिनिधी) जिल्हयामध्ये दि. १४ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत जिल्हा कृषि संजीवनी महोत्सव 2025चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे आयोजन कृषि विभाग प्रकल्प संचालक कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) परभणी व संजिवनी मित्र मंडळ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने संत तुकाराम महाविद्यालय क्रिडांगण, वसमत रोड, परभणी करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक दौलत चव्हाण यांची उपस्थिती होती. यामहोत्सवामध्ये सहा दालन राहणार असून एकूण 200 स्टॉल्सची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकरी स्टॉल्स, सजीव नमुने, प्रात्यक्षिके, तसेच प्रमुख आर्कषण म्हणून नाविन्यपुर्ण पशु इ. चा समावेश असणार आहे. तसेच यामध्ये कृषि प्रदर्शने, कृषि विषयक परिसंवाद, यशस्वी शेतकरी, शाखज्ञ तंत्रज्ञ यांची व्याख्याने तसेच उत्पादक ते ग्राहक थेट विक्री ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.
शेतकरी, कृषि बचतगट, महिला बचतगट, शेतकरी उत्पादक कंपनी, सेंद्रीय शेतमाल उत्पादन तयार करणारे शेतकरी, कृषी प्रक्रिया करणारे उद्योजक, इत्यादींना या महोत्सवात 60 कृषि स्टॉल विनाशुल्क देण्यात येणार आहेत. तसेच बियाणे कंपन्या, खते कंपन्या, किटक नाशक कंपन्या, तण नियंत्रण कंपन्या, ठिबक- तुषार संच कंपन्या, प्रक्रीया करणार्या कंपन्या व इतर कृषिशी निगडीत कंपन्या यांना 100 स्टॉल्स माफक दरात देण्यात येणार आहे. यासाठी आत्मा प्रकल्प उपसंचालक श्री अभिषेक घोडके मो.नं. 9922516716 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृृषी अधीक्षक दौलत चव्हाण यांनी केले आहे.
तसेच यामध्ये पशु प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्यासाठी पशुपालकांनी देखील संपर्क साधावा.शेतकरी बांधवांना फुले, फळे, तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य इत्यादीचे जीवंत नमुन प्रदर्शनात सादर करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. तसेच सहभागी शेतकरी, पशुपालक यांच्यामधून पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे.
कृषि विषयक विकसीत तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकर्यांपर्यंत पोहचविणे, शेतकरी – शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण. समुह/गट संघटीत करुन स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे, शेतकर्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसीत करणे, कृषि विषयक परिसंवाद/व्याख्याने यांचे माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणीव्दारे शेतकर्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषि उत्पादनास आणि विपणनास चालना देणे हे या प्रदर्शनाचे उद्देश आहेत असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.