परभणी, (प्रतिनिधी) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्यामार्फत देशभरात राबविण्यात येणाऱ्या ‘आपदा मित्र कार्यक्रमा’अंतर्गत परभणी जिल्ह्यातील 300 स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षित स्वयंसेवकांमधून चक्रधर जावळे, अभिषेक भोसले, विष्णू राठोड आणि चंद्रशेखर कदम या चार जणांची निवड मास्टर ट्रेनर म्हणून करण्यात आली.
निवड झालेल्या या आपदा मित्रांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गुजरात येथे 21 दिवसांचे निवासी ऍडव्हान्स प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणात विविध प्रकारच्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमधील व्यवस्थापन, तांत्रिक कौशल्य, शोध आणि बचाव कार्य, समुदायाला प्रशिक्षण देण्याची पद्धत, आणि प्रभावी समन्वय अशा अनेक बाबींचा समावेश होता.
प्रशिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर आज या चारही आपदा मित्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासमोर प्रशिक्षणाचा आढावा सादर केला. जिल्हाधिकारी महोदयांनी त्यांचे अभिनंदन करत, या मास्टर ट्रेनर्सनी जिल्ह्यातील इतर स्वयंसेवकांना सक्षम बनवावे आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात सक्रीय योगदान द्यावे, असे आवाहन केले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके, जिल्हाधिकारी यांचे स्विय सहायक कैलास मठपती उपस्थित होते.
या प्रसंगी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते या चारही आपदा मित्रांना प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांच्या कार्याची आणि प्रशिक्षणात दाखवलेल्या उत्कृष्ट सहभागाची प्रशंसा करण्यात आली.
या उपक्रमामुळे परभणी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम व प्रभावी होणार असून, भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्तींना समर्थपणे सामोरे जाण्याची तयारी निर्माण झाली आहे.
—