परभणी (प्रतिनिधी)आज कृषी विज्ञान केंद्र परभणी च्या वतीने आयोजित विकसित भारत संकल्प अभियान कार्यक्रमात रूढी व खरबा परिसरातील संत्रा बागायतदार यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमात वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे उपसंचालक संशोधन प्राध्यापक डॉ हरिहर कौसडीकर यांनी संत्रा बागेसाठी जमिनीचे आरोग्य आणि संतुलित पीक पोषण संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी बहार व्यवस्थापन, फूल गळ, फळगळ, रोग व कीड व्यवस्थापन , दर्जेदार फळ उत्पादन या बाबत प्रश्न विचारून शंका समाधान करून घेतले. डॉ कौसडीकर यांनी सध्या परभणी परिसरातील संत्रा बागेतील जमिनीचे आरोग्य बिघडलेले निदर्शनास आले असून सेंद्रिय कर्ब कमी झाले असून सहा ते आठ अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येत आहेत त्यामुळे संत्रा उत्पादनात अनेक अडचणी दिसून येत आहेत असे नमूद केले. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनेतून बागेत जैविक आच्छादन, विद्यापीठ उत्पादित जैविक खताचा वापर, बायोमिक्स चा वापर आणि विशेष अन्नद्रव्य व्यवस्थापनात विद्राच्या खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्य वापर या विषयी सखोल मार्गदर्शन केले
या प्रसंगी कृषि विज्ञान केंद्र परभणी चे अतुल तुपे, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे संत्रा विशेषज्ञ डॉ नरेश मेश्राम आणि कृषी विद्यापीठातील मृद विज्ञान विभाग प्रमुख डॉ प्रवीण वैद्य यांचेसह महिला शेतकरी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.