परभणी (प्रतिनिधी) मराठवाडा हा आयटी क्षेत्राच्या दृष्टीने कायम मागास समजला जातो, मात्र परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच आयटीच्या संधी निर्माण होत आहेत. पालकमंत्री मेघना बोर्डिकर-साकोरे यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात पहिली आयटी कंपनी येत असून जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांच्या पोरांना यामध्ये संधी दिल्या जाणार आहेत.
तीन वर्षांपूर्वी संगमनेरमध्ये बाप कंपनीची सुरुवात झाली होती, ज्याची चर्चा राज्यभर झाली. रावसाहेब घुगे यांनी अमेरिकेतील नोकरी सोडून खेड्यातील मुलांसाठी काही तरी केलं पाहिजे या विचारातून या कंपनीची सुरुवात केली होती. आजघडीला त्यांच्याकडे शिकाऊ विद्यार्थी आणि कर्मचारी असे मिळून ६०० पेक्षा जास्त लोक जोडले गेले आहेत आणि संगमनेरपासून काही अंतरावर असलेल्या पारेगावात त्यांनी भव्य आयटी कंपनी सुरु केली आहे. हीच आयटी कंपनी आता परभणी जिल्ह्यातील सेलूमध्येही येत आहे.
परभणी जिल्ह्यात ही कंपनी नेमकं काय करणार आहे, शेतकऱ्यांच्या मुलांना गावातच संधी कधी तयार होतील, संगमनेरच्या कंपनीत काम केलेल्या इंजिनिअर्सच्या आयुष्यात काय बदल झाले यावर रावसाहेब घुगे यांची जाहिर मुलाखत घेतली जाणार आहे. पालकमंत्री स्वतः या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. परभणीतील श्री शिवाजी महाविद्यालयात १४ जून रोजी सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमासाठी यावं आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जागरुक व्हावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. ही मुलाखत स्टोरी डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर प्रसिद्ध केली जाणार असून चॅनलचे संपादक आणि मुंबईतील पत्रकार विशाल बडे ही मुलाखत घेणार आहेत. विद्यार्थ्यांना आणि पालकांना या मुलाखतीत प्रश्न विचारण्याचीही संधी मिळणार आहे. परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच आयटी क्षेत्रातील दिग्गजाकडून प्रश्नांची उत्तरं मिळणार असल्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे.